Friday, December 2, 2011

दुर्ग कलावंतीण

'यशवंतराव चव्हाण द्रुतगती' मार्गवरून पुण्याकडे जाताना पनवेलच्या पुर्वेला माथेरानच्या रांगेत दिसणारा प्रबळगड आणि कलावंती दुर्गाचा 'V' Shape नेहमीच लक्ष वेधून घेतो. मुंबई पासून जवळ असूनही काही ना काही कारणांनी या किल्ल्याची मोहिम बर्‍याच वेळा रद्द झाली. जवळच तर आहे मग आज नै तर उद्या होईलच... असे मनाशी घोटवून पुढे गेल्यावर पाच एक मिनिटांत इरशालगडाचा 'W' Shape दिसतो. या दोन्ही गडांकडे बघताना मन नेहमी खट्टू होतं... कधी कधी वाटे शेडूंग फाट्यावर गाडीतून उतरावे नी थेट 'ठाकूरवाडी'कडे कूच करावी.



जवळच आहे तर माबोच भटकंती गटग तिथेच करू अशी गेली दोन वर्ष वंदता ऐकत होतो पण सगळ्या भटक्यांचा एकत्र भेटण्याचा योग जुळून येईल तर तो ट्रेक कसला... म्हणून मी आणि गिरिविहारने 'ऑफबिट सह्याद्री' सोबत २३ ऑक्टोबरच्या रविवारी प्रबळगड नाही तर निदान कलावंतीणचा दुर्ग तरी सर करायच निश्वीत केलं. ऑफबिट सोबत जायचे तर रविवारी सकाळी ८ला पनवेल गाठायचे होते... म्हणजे पुर्ण चढाई उनातून होणार यात काहीच शंका नव्हती. तसही दिवाळी नंतर कोणताही मोठा ट्रेक होणार नसल्याने आम्ही जायचे निश्चीत केले.



ठरल्याप्रमाणे ८ला पनवेल स्टेशन गाठले. ऑफबिटच्या राजसला फोन केला तर भाई एस्टी स्टॅण्डवर मिसळ खाण्यात दंग होते... थोड्याच वेळात आम्ही दोघेही त्यांच्यात सामिल झालो. दुपारच्या जेवणाची सोय म्हणून पराठे वैगरे विकत घेतले. सातशे रुपयात १४ जणांना टमटम मधे कोंबून आमची सवारी निघाली 'ठाकूरवाडी' कडे.



वाडीत पोहचे पर्यंत दहा वाजून गेले होते नी उनाचा तडाखा चांगलाच वाढला होता. वेळ न दवडता लगेच चढाईला सुरवात केली. पहिल्या पडावात ओळख परेड करुन पुढिल उभ्या चढाई साठी सज्ज झालो. पाठीवरील सॅक मधे तीन लिटर पाण्या व्यतिरिक्त कसलेच वजन नव्हते. तरीही उन्हाचा त्रास जाणवत होता. ऑफबिटने नावाला साजेसाच खड्या चढाचा मार्ग निवडून आमची पार हवाच काढून टाकली. ऑफबिटचे सगळे मावळे चपळतेने पुढे गेले, मात्र माची पर्यंतच्या खड्या चढाईने आम्हा दोघांची पार वाट लागली होती.



माची वरील एका शिळेवर कोण्या हौशी शिलेदाराने आपल्या अयशस्वी प्रेमाचा शि'ळा'लेख खरडवून ठेवला होता. मनात विचार आले, 'जल्ला... इथ पर्यंत पोचताना आमची ही दमछाक होते आणि ह्या शिलेदारांना कुठून बरं जोर येतो एव्हढ्या वर येऊन शिळालेख खरडवत बसायला?'. म्हणतात ना 'प्रेमाला उपमा नाही'... त्या उपमा पाहुन मलाही सुरसुरी आली होती की लिहावे, 'गडावर प्रेम करा दगडावर नको'... पण म्हंटले नको... तो आपल्या 'दगडा'चा अपमान होईल. ;)



माची वरील एकुलत्या एका झाडा खाली विसावा घेऊन पुढे निघालो तर समोर बुरुजावरील कातळात कोरलेले बजरंगबली आणि गणपती दिसले. तसेच पुढे गेल्यावर माचीवरील वाडीत 'गावठी चिकन करून मिळेल' अशी पाटी दिसली आणि मग काय म्हणता... अंगात जो काय उत्साह संचारला... त्यासाठी एका दमात गड सर करुन येऊ. पण कसलं काय, ती पाटी फक्त नावा पुरताच होती. शेवटी पिठलं भाकरीची ऑर्डर देऊन शेवटच्या टप्प्याकडे निघालो.



प्रब़ळ आणि कलांवती मधल्या बेचक्यात आलो तेव्हा दुपारचे बारा वाजून गेले होते. त्या घळीच्या पुर्वेकडील बाजूस प्रबळचा उंचचउंच कडा होता आणि तिकडे थंडगार सावली... तर पश्चिमेकडे तोंड करून उभा असलेला कलावंतीचा कडा उन्हात तापत होता. सगळ्यांच्या मनात एकच विचार 'सरणार कधी उनं', पण त्याही उनात गड सर करणे भागच होते.



तसा हा सोप्पा ट्रेक... मुनलाईट ट्रेक करायचा सोडून ऑफबिटने उगाच उन्हातून आमची वरात काढली... म्हणून थोडावेळ त्यांच्या नावाने ठणाणा केला.



अरे हा पायर्‍यांचा पॅच फक्त १४ मिनीटांत आम्ही पार करून टॉपला जातो... असे म्हणून लिडरलोक चॅलेंज देऊ लागले... म्हंटले, "१४ काय ७ मिन्टात चढून जाऊ, पण या ऑक्टोबरच्या उन्हात ते शक्य नाही". शेवटी गडावरच्या प्रेमाला जागून आम्ही साडेचौदा मिनिटांत तो पायर्‍यांचा पॅच चढून वर गेलो. वर रखरखीत उन... सावली साठी एकही झाड नाही.



प्रचि मराठी कट्टावरून साभार... हे प्रचि प्रबळगडा वरून काढलेले आहेत.













अगदी टॉपवर जाण्यासाठी एक विस फुटाचा रॉकपॅच पार करावा लागणार होता. लिडर लोक रोप लावण्याच्या कामात गुंतले होते. तो पर्यंत सावली साठी आम्ही त्या रॉकपॅचच्या पुर्वेकडील बाजूला चिटकून बसलो होतो. तो रॉकपॅच रोप न लावता चढणे सोपे होते परंतू उतरताना मात्र रोपची नितांत आवश्यकता भासली.



माथ्यावर कमीत कमी हजार चौ.फु. जागा होती. टेळहणी साठीच तिचा वापर करत असणार यात शंका नाही. फारसे अवशेष दिसले नाहीत. कलावंतीण इतिहास मात्र कळला नाही. वरून टेहळणी करताना समोर उजविकडे अग्नेयला माथेरानचे पठार दिसत होत... तर इरशालगड प्रबळच्या मागे लपला होता. पुर्वेला चंदेरी, विकटगड दिसला... तर इशान्येला धूसर वातावरणात कल्याणची खाडी, हाजी मलंग दृष्टिस पडला. पश्चिमेला कर्नाळाच्या सुळका आणि उत्तरे कडे पनवेल ते खारघरचा परिसर दिसतो. स्वच्छ वातावरण असते तर वायव्यकडील JNPT आणि मुंबईचा परिसर दिसला असता.





स्थळदर्शन पार पडल्यावर एक ग्रुप फोटो काढून खाली उतरायला सुरवात केली. उतरताना रॉकपॅच ते पायर्‍यांचा पॅच चक्क १४ मिनीटांच्या आत पार केला. :p खाली बेचक्यात बसून थोडी विश्रांती घेतली आणि माची वरील घराकडे प्रस्थान केले. पिठलं-भाकरीच जेवण आटोपले. घरासमोरील निवांत फिरणार्‍या कोंबड्याचे फोटो घेण्यात आले. (फक्त आठवणं)



उतरताना ऑफबिट रुटने न जाता मळलेल्या पायवाटेने उतरल्यामुळे थोडं वळसा घालावा लागला खरा पण वाटेत सावली असल्यामुले फारसे कष्ट पडले नाहीत. चारची एस्टी गाठणे हे एकच उद्दिष्ट होते. आरामात ठाकूरवाडीत पोहचलो ते प्रबळगडाला लवकरच भेट देण्याचे आश्वासन देत.

No comments:

Post a Comment