Monday, November 17, 2014

नंदनवन!

मागील दोन वर्षात हिमालयात झालेल्या दोन्ही टुर ह्या जुलै-ऑगस्ट मधल्या होत्या. तो उन्हाळ्यातील निसर्ग मनमुराद अनुभवल्या नंतर... आता मनाला ओढ लागली होती ती थंडीतल्या हिमशिखरांची. दिवाळी नंतरचा begining Autumn हा त्या साठीचा अगदी योग्य काळ... चला तर मग सफर करुया शरद ऋतूतल्या नंदनवनाची...
स्वागतासाठी चिनारने Red Carpet घातल होतं.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५

Friday, September 5, 2014

धोडप, मार्कंड्या आणि सप्तशृंगी

नाशिक जिल्ह्यात तीन मुख्य डोंगररांगा पसरलेल्या आहेत . त्र्यंबकेश्वर, सातमाळ आणि बागलाण. या तीन मुख्य रांगाना अजंठा सातमाळ आणि बालाघाट या दोन उप-डोंगररांगाची जोड आहे. यातील अजंठा सातमाळ रांगेत नाशिक जिल्ह्यातील बहुतेक मोठे किल्ले वसलेले आहेत. या डोंगरांगांच्या आजुबाजुला विस्तर्ण पठारी प्रदेश आहे. सह्याद्रीतील दुर्गम डोंगररांगा मधे स्वराज्य स्थापन केलेल्या महाराजांना नाशिकच्या या भौगोलीक परिस्थीतीची उत्तम जाण होती, हे त्यांनी घेतलेल्या नाशिक मधिल किल्ल्यांवरुन लक्षात येते.

गेल्या मोसमातील बागलाण डोंगररांगेतील साल्हेर, मुल्हेरच्या ट्रेक वरुन परतत असताना.. या सातमाळ डोंगर रांगेतील उंचच उंच धोडप दुरुन खुणावत होता. पावसाळ्यात धोडपला भेट द्यायचीच असा मनाशी निश्चय केला होता. मात्र यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने आणि त्यातच नाशिक कडे पाठ फिरवल्याने धोडपवारी रद्द होण्याच्या मार्गावर होती. त्यातच यंदाचा धोडप वर होणारा माबोकरांचा सह्यमेळावाही ऐनवेळी रद्द झाला. अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे १४ ऑगस्टच्या संध्याकाळी रोमा, यो, गिरि, आनंदला सोबत घेऊन आम्ही नाशिक कडे प्रस्थान ठेवले.

नाशिक नंतर आग्रा महामार्ग सोडून वडाळी भोईला आत शिरलो.. धोडांबे गाव मागे टाकत धोडपच्या पायथ्याला हट्टीगावात पोहचलो. गावात जाणार्‍या रस्त्याची अवस्था फारच दयनीय होती. चिखलात हरवलेल्या रस्त्यातून गाडी काढत कसे बसे गावातल्या चौकात पोहचलो. स्वातंत्र्यदिना निमित्त शाळकरी मुलांची शाळेत जाण्याची घाई सुरु होती... तर चौकातही झेंडावंदनाची लगबग सुरु होती.

हट्टीगाव अगदी लहानस आहे. रस्ते आणि साफसफाईच्या बाबतीत मात्र फार गचाळ वाटलं. गावातील वाटाड्याने दिलेला चहा घेऊन, आम्ही धोडपच्या मार्गाला लागलो. गावा मागील बंधार्‍या शेजारुन जाणारी ही वाट गडा कडे घेऊन जाते.



सातमाळ पर्वतरांगेतील धोडप किल्ल्याचा उल्लेख १६व्या शतकात 'धरब' या नावने आढळतो. मुघलशाही आणि निमाजमशाही नंतर पेशव्यांनी या किल्ल्यावर आपले निशाण रोवले होते.

धोडपचा चढ सुरु होण्या आधी वाटेत मारुतीरायाची उघड्यावरिल मुर्ती दिसते. मुर्तीच्या उजवी कडिल वाटे वरुन चढाईचा शुभारंभ केला. साधारण विस एक मिनीटांच्या चढाई नंतर धोडप माचीवरिल पहिल्या दरवाजापाशी आम्ही पोहचलो. माचीवरिल बुरजाच्या आतील बाजुस पाण्याच टाकं आहे. त्या टाक्यावरिल एका खोबणीत श्री गणेश विराजमान आहेत. टाक्याच्या वर एक आश्रम आहे.



माची वरुन गडाचा अवाढव्य पसारा लक्षात येतो. गडाची तटबंदी पुर्णपणे धुक्यात हरवली होती. सुसाट सुटलेला वारा काही क्षणा पुरता धुक्याचा पडदा बाजुला सारुन त्या तटबंदीचे दर्शन घडवत होता.




येथुन पुढिल दगडीवाट अगदी सुस्थितीत आहे. जागोजागी झाडांची, पक्षांची, प्राण्याची माहिती देणारे फलक आहेत. विस एक मिनिटांत या वाटेवरुन आम्ही धोडपच्या आडव्या भिंती खाली आलो. इथुन धोडपच्या उजवीकडील डोंगररांगेतील इखारा शिखर, कांचना, कोलधेर, राजधेर, किल्ले इंद्राई दिसत होते. तर समोर हट्टी गावापासुन धोडांबे पर्यंतचा विस्तीर्ण प्रदेश दिसत होता.



धोडपच्या कड्या खाली सोसाट्याचा वारा सुटला होता.. येथील अरुंद वाटेवर रेलींग लावलेले असल्याने ती पार कारणे सहज शक्य झाले. ही वाट आम्हाला एका उध्वस्त दरवजाकडे घेऊन गेली. इथे एक देवडी आणि दरवाजाचे ढासळलेले बुरुज एव्हढच काय ते शिल्लक होतं.






दरवाजा बघुन पुढे निघालो आणि गडाच्या पुर्वेकडील तटबंदी खाली आलो.



थोडा वर चढुन गेल्यावर कातळात खोदलेल्या पायर्‍या लागल्या... शेजारील कातळावर फारशी भाषेतील शिलालेख आहेत. या पायर्‍या आपल्याला कातळात कोरलेल्या दरवाजा कडे घेऊन जातात. या दरवाज्याचे वैशिष्ठ्य म्हणजे काटकोनात असलेला प्रवेश. शत्रुला समोरुन धडक मारायला काहीच वाव नाही. दरवाजातुन आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजुला देवड्या असुन दरवाज्याला आतुन अडसर घालण्यासाठी खोबण्या आहेत.






दरवाजातून दिसणारे वार्शी गावाच विहंगम दृष्य



या दरवाजातुन वर जाणारी वाट आपल्याला बालेकिल्ल्या कडे घेउन जाते. वाटेत दोन पाण्याची टाकी आणि वाड्याचे काही अवशेष दिसले. मात्र छातीभर वाढलेल्या गवतात गडावरचे इतर अवशेष शोधणे अशक्य होते.



वाड्याचे अवशेष बघुन पुढे गुहांकडे निघालो.. इथुन डाव्या बाजुला रेलींग लावलेली वाट गुहांपाशी घेउन जाते.



या वाटेच्या डाव्या बाजुला दरी तर उजव्या बाजुला धोडपचा कातळ कडा आहे. याच कड्याच्या पोटात बर्‍याच गुहा आहेत. मात्र शेवटची गुहा मुक्कामास योग्य आहे. या प्रशस्त गुहेत एका वेळी २०-३० जण मुक्काम करु शकतात. गुहेच्या आत डाव्या बाजुला देवीची मुर्ती आहे. गुहे शेजारीच शंकराची पिंडी आणि पिण्याच्या पाण्याच टाकं आहे.







गुहेच्या पुढे शंभर-दिडशे पावलांवर धोडपच्या कातळात पडलेली सुप्रसिद्ध खाच पहावयास मिळते. इथे वार्‍याचा जोर प्रचंड असल्यानेमुळे मी तेथुन काढता पाय घेतला.
   




धोडपचा विस्तार लांबलचक पसरलेला आहे. गडावर पाहण्या जोगी बरिच ठिकाणं आहेत. पण घोंघावणारा वारा आणि धुक्या मुळे जास्त वेळ थांबणे अशक्य होते. परतीच्या वेळी यो, रोमा आणि आनंद कड्याच्या पुर्वेला असलेल्या गुहा पाहुन आले. मी आणि गिरीने मात्र खालच्या दरवाजा जवळ जाऊन आडोसा घेणे पसंत केले.
एव्हाना १०.३० वाजुन गेले होते आणि धुकं विरळ होऊ लागलं होतं.. गड उतरताना इखारा शिखराने धुक्यातुन बाहेर येत आम्हास दर्शन दिले. त्या मागुन किल्ले कांचनाही डोकावत होता.



कातळकडा उतरुन आम्ही पुन्हा फरसबंदी वाटेवर आलो. सकाळी वर चढताना धुक्यात हरवलेली धोडपची भिंत आणि त्यातील खाच आता स्पष्ट दिसत होती.
 


या फरसबंदी वाटेच्या डावीकडे एक दुमजली विहिर आहे. या दुमजली विहिरीत उतरण्यासाठी जिने आहेत.. या जिन्याला नक्षीदार कमान आणि वर गोल घुमट आहे.





विहिर बघुन मागे फिरलो आणि सोनारवाडीच्या वाटेला लागलो. वाटेत छोटसं हनुमान मंदिर आणि शिवलिंग दिसलं.. पुढे अजुन एक पायर्‍यांची विहिर दिसली.. विहिरीतल नितळ पाणी बघुन जीव सुखावला. विहिरी पासुन हाकेच्या अंतरावर कळवण दरवाजा आहे.



या दरवाजा पासुन डावी कडे जाणारी वाट ओतुर मार्गे कळवण गावात उतरते.. तर समोर जाणारी वाट मोठ्या तलावा पर्यंत घेऊन जाते. तेथील बुरजा खालुन जाणारी वाट इखारा आणि कांचनाला घेऊन जाते. त्या तलावा पर्यंतची मजल बरिच होती, म्हणुन आम्ही परत हट्टीगावची वाट पकडली.



हट्टी गावात पोहचल्यावर आता कोणता किल्ला करावा या वर चर्चा रंगली. उजवी कडे गेलो तर फक्त कांचना किल्लाच करता येईल.. आणि डावीकडे गेलो तर मार्कंड्या आणि सप्तशृंगी देवीच दर्शन पण घेता येईल असा प्रस्ताव पुढे आला.. आणि सर्वानुमते तो मंजुरही झाला.

हट्टीवरुन परत धोडांबेला न जाता पारेगाव वरुन मुळबारी खिंडीत आलो. पावसाळ्यामुळे या मार्गावर गाडी चालवणे जिकरीचे झाले होते. एके ठिकाणी गुढघाभर चिखलातुन गाडी बाहेर काढताना चांगलीच तंतरली होती.

मार्कंड्या करायचा तर बाबापुर गावात उतरावे लागते. पण जर गाडी असेल तर मुळणे गावात जाणार्‍या मुळणबारी खिंडीत गाडी लावुन... डावी कडच्या डोंगररांगे वरुन मार्कंड्या वर जाता येते तर उजवी कडच्या रांगेवरुन रावळ्या जावळ्या वर जाता येते.

खिंडीत पोहचलो तेव्हा साडे चार वाजुन गेले होते.. आणि वर जाण्यात कोणालाच उत्साह नव्हता. खिंड उतरुन गाडी मुळण गावात थांबवली. मुक्कामासाठी मंदिर किंवा शाळेत आसरा मिळवण्याची चाचपणी सुरु झाली. यो रॉक्सने गावात जाऊन चौकशी सुरु केली. संध्याकाळचे पाच वाजले होते, पण पावसाने अंधार केल्यामुळे सात वाजल्याचा माहोल तयार झाला होता. योच्या प्रयत्नांना यश आलं.. आम्हाला मुळण गावातील अंगणवाडीत आसरा मिळाला.



कालचा रात्रीचा प्रवास आणि दिवस भराच्या भटकंतीने सगळेच गळपटले होते. कुणी गावकर्‍याने आयता चहा आणुन द्यावा अशी सगळ्यांची इच्छा होती. पण ते शक्य नव्हते... सगळे गावकरी शेतीच्या कामात व्यस्त.. नाईलाजाने शाळेच्या पडवीत चुल पेटवण्याच अशक्य काम सुरु झालं.. बाहेर पावसाची ओल त्यात सरपणाचा अभाव अश्या बिकट परिस्थीतून वाट काढत सरते शेवटी चुल पेटवली... नी चहा ऐवजी गरमा गरम सुप पोटात ढकललं... लागलीच पेटत्या चुलीवर रेडी टु ईटचा सांबार राईस गरम केला.. तोंडी लावायला पापड भाजुन घेतले. दिवस भराच्या श्रमाने थकलेले जीव रात्री ८ वाजताच ढाराढूर झाले.

सकाळी उठवल्यावर मॅगी बनवायचा प्लॅन एकमताने धुडकावण्यात आला.. परत चुलीशी झटापट करण्यात कोणालाच रस नव्हता.. सुका खाऊ खाऊन गपगुपान परत खिंडी कडे गाडी वळवली.

मार्कड्या गड हा मार्कंडेय ऋषींच्या वास्तव्याने पावन झालेला गड अशी याची ओळख... मुघलांकडे असलेला हा किल्ला वणीच्या लढाई नंतर महारांजांनी जिंकुन घेतला. महाराजां नंतर परत मुघलांनी तो त्याब्यात घेतला .
    




मार्कंड्या पुर्ण पणे धुक्यात लपला होता.. मुळणबारी खिंडी पासुन मार्कंड्यावर जायला रेलींग लावलेल्या पायर्‍यांची वाट आहे. धुक्यामुळे चढाईचा अंदाज बिलकुल येत नव्हता... पायर्‍या संपल्यावर पहिला दरवाजा लागला.. हा पहिला टप्पा पार करुन आम्ही गडाच्या माची वर आलो. मार्कंड्या गडाची माचीही धोडप प्रमाणे ऐसपैस पसरलेली आहे. बाले किल्ल्या पर्यंत जाणारी मळलेली पायवाट आहे. धुक्यामुळे गडावर काहीच दिसत नव्हते.

नेट वरुन रोमाने गडाची माहिती डाऊन्लोड केली.. त्या माहितीच्या आधारे आम्ही बालेकिल्ल्याची वाट धरली. माचीच्या डावीकडे एक प्रचंड कातळकडा आहे. तो वर चढुन गेल्या वर त्या कड्याच्या पोटात खोदलेल्या दोन ध्यानगुंफा दिसल्या.. २ चौ.मि. आकाराच्या चौकोनाकृती कुंडातुन ध्यानगुंफेत जाण्याची वाट आहे.
कुंडात उतरलेल ध्यान.
               


या भुयारातुन गुढघ्या वर सरकत पुढे गेल्यावर ध्यानगुंफा आहे. पावसाळी वातावरण आणि त्यातच माणसांचा वावर नसलेल्या या गुहेत पुढे जायच आम्ही टाळलंं. या गुंहा पासुन उजवी कडचा चढ चढत वर गेल्यावर मार्कंड्याचा बालेकिल्ला येतो... ध्यानगुंफा येई पर्यंत आम्ही बरिच उंची गाठली होती. तरी चढाईचा अंदाज येत नव्हता. त्यातच जोराचा वारा आणि पाऊस सुरुच होता. त्यामुळे मी आणि गिरिने बालेकिल्ल्या वर न जाता खालीच थांबण्याचा निर्णय घेतला. आनंद, यो आणि रोमा वर बालेकिल्ल्या कडे निघुन गेले.



बराच वेळ झाला तरी तिघांचा काहीच पत्ता नव्हता.. म्हणुन आम्ही परत माची वर आलो. वाटेत एक आश्रम दिसला. याच आश्रमात रहाण्याची सोय होते, हे नंतर यो कडुन कळलं. खाली उतरताना मधेच गडावरच धुकं नाहिस झालं आणि बालेकिल्ल्याच्या टोकावरिल मार्कंडेश्वराच मंदिर दिसलं.



सकाळचे नऊ वाजत आले होते आणि धुकं हळु हळु विरळ होऊ लागलं होतं... धुक्याचा पडदा हटल्यावर खालचा परिसर आता स्पष्ट दिसू लागला. पुर्वेकडच्या डोंगररांगेतील रावळ्या-जावाळ्या या जोडगोळीने दर्शन दिले.



खिंडीच्या डावी कडील.. आम्हाला रात्रीचा आसरा देणारं मुळीण गाव.



तर खिंडीच्या उजवी कडील... बाबापुर गाव.



आम्ही दोघं गड उतरुन खाली खिंडीत आलो, तेव्हा या तिघांची स्वारी वरच्या माची वर दिसली.



दहा नंतर धुकं पुर्णपणे नाहिस झाल्यावर मार्कंड्याच दिसणारं अवाढव्य रुप.



ओतुरच्या वाटे वरिल खुणावणारे.. रावळ्या-जावळ्या.



खाली उतरल्यावर गाडी मुळीण गावच्या बांधार्‍यावर थांबवली... कारण शुचिर्भुत होऊन पुढे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाण्याचा बेत होता. आंघोळीचा कार्यक्रम आटोपुन ओतुर - साकोरे मार्गे नांदुरीला निघालो. वाटेत गगनाशी हातमिळवणी करणारा धोडप दिसत होता.
        


साकोरे फाट्यावरुन नांदुरीला आलो.
 


सप्तशृंगी देवीच्या दर्शंनाला भाविकांची फारशी गर्दी नव्हती. मात्र पावसाळा असल्यामुळे गडफेरीचा मार्ग बंद केला होता. इथुन मार्कंड्या अगदी हाकेच्या अंतरावर दिसत होता.



श्रावणातल्या या ट्रेकने आम्हाला उन, वारा, पाऊस, धुकं आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे हिरवाईने नटलेल्या वसुंधरेच मनमोहक रुप अनुभवयास दिलं. मन अगदी प्रसन्न झालं.
 
येताना सातमाळ पर्वत रांगेचा सुंदर पॅनो मिळाला. डावीकडे अस्पष्ट दिसणारा धोडप किल्ला, त्या नंतर रावळ्या-जावळ्या, मधे मार्कंड्या आणि उजविकडील वणीच्या सप्तशृंगी देवीचा गड.