Thursday, March 8, 2012

कल्याण दरवाजा (माहुली)

थंडीचा जोर ओसरल्याने मुंबई जवळील नाईट ट्रेकच्या मोहिमेचा बेत शिजू लागला. नाशिक रेंज मधिल पट्टा, हरिहर असे एक दिवसाचे ट्रेक करण्याचा मानस होता. पण टांगारुंच्या कृपेने तो फिसकटला. आयत्या वेळी कुठे जायचे हा प्रश्ण भटक्यांना कधीच पडत नाही... एक हाक दिली की सह्याद्रीतून हजारो प्रतिसाद येतात... तो प्रश्ण 'ऑफबिट सह्याद्री'ने सोडवला... महाशिवरात्रीचा मुहुर्त साधून माहुली-भंडारगड मार्गे 'कल्याण दरवाजा' अशी मोहिम ठरली होती... रोमा, गिरी आणि मी त्यात सामिल झालो.



रात्री आसनगाव स्टेशनला उतरून टेंपोने माहुलीचा पायथा गाठला... मध्यरात्री दिडच्या सुमारास चढाईला सुरवात केली आणि हाशऽहुशऽ करत तीन तासात नियोजीत स्थळी पोहचल्यावर लगेच ताणून दिली.



























सकाळी ऊडी बाबाचा कार्यक्रम आटोपून गडाच्या मुख्य दरवाजा जवळ आलो. दरवाजा पुर्णपणे ढासळलेला होता. एके काळच्या राजमार्गावर प्लॅस्टिकचा कचरा अस्थाव्यस्थ पसरला होता. दरवाज्या जवळ देवड्यांची रचना पहावयास मिळाली... मात्र पुढिल पायर्‍यांचा भाग कोसळलेला आहे.

























बहुतेक ट्रेकर्स माहुली ते भंडारगड असा ट्रेक करतात. परंतू आम्ही भंडारगडाचा उद्धवस्त 'कल्याण दरवाजा' उतरून माहूलीच्या पश्चिमेकडील नाळेतून वर चढणार होतो. भंडारगड आणि माहुली वर पिण्याच्या पाण्याचे प्रत्येकी एकच टाकं आहे. पुढिल ५-६ तासाच्या मार्गात पाण्याच दुर्भिक्ष आहे याची जाणिव होती म्हणुन जवळील दोन लिटरची बाटली फुल्ल करुन घेतली.







वाडा परिसर





वजिर सुळका





भंडारगडा वरुन पश्विमेला कोकणात उतरणार दरवाजा म्हणजे 'कल्याण दरवाजा'.







हा दरवाजा उतरायच म्हणजे ५० आणि ९० फुटांचे दोन रॉक पॅचेस् रॅपलिंग करून उतरावे लागतात.















तेथून पुढे कड्या जवळील निमुळत्या वाटेने खाली उतरल्यावर एका १० फुटी खिंडाराला (चिमणी असही म्हणतात) पाठ आणि पाय लावून उतरावे लागले.























जस जसं खाली उतरत होतो तशी वाट अजूनच खडतर होत होती. बर्‍याच ठिकाणी पायर्‍या नामशेष झाल्या होत्या... फक्त मातीचा घसारा शिल्लक होता तर उजविकडे दरीचा दरारा कायम होता. आधारासाठी कड्याचा दगड पकडावा तर तो ठिसूळ दगड चक्क हातात यायचा. अश्या खडतर मार्गावर आत्मविश्वासाचा पार बोर्‍या वाजतो. पाय आणि हातांचा योग्य तो समन्वय साधात आम्ही शेवटच्या १०० फुटी रॉकपॅच वर पोहचलो. दुपारचा दिड वाजला होता आणि सगळ्यांचे पाणी एव्हाना संपले होते. शेवटच्या रॉक पॅचचे वैशिष्ट्य म्हणजे ४० फुट खाली उतरल्या नंतर खाली विस-एक फुट Overhang आहे. त्यामुळे हवेत तरंगतच रॅपलिंग करत खाली यावे लागले.. पहिल्या बॅच मधिल सर्वच जण रॅपलिंगला सरावलेले असल्यामुळे आम्ही तो टप्पा लिलया पार केला.







सुळक्यांची नावे डाविकडून नवरी, नवरा, मधे भटोबा, वर्‍हाड आणि सगळ्यात शेवटी वजिर सुळका.









शेवटचा पॅच उतरल्यावर पुढे कड्या लगतच्या न दिसणार्‍या वाटेवरून ४५ अंशाच्या कोनात उतरून एका पठारावर आलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. दुपाराच्या उन्हात थोडा वेळ सावलीत आराम करून वाटाड्या सोबत पुढे निघालो. आता आम्ही गडाच्या पश्चिमे कडून मार्गक्रमण करणार होतो, त्यामुळे उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार होता. पाण्याचा साठा आधीच संपल्यामुळे सगळे त्रस्त होते. कधी एकदा खिंड गाठतो असे झाले होते. गडाच्या या बाजुला कोणी फिरकत नाही. साधी ढोरवाट सुद्धा अस्तित्वात नाही. त्यातच वणव्याने थोडे फार शिल्लक असलेले जंगल पार साफ करून टाकले होते. राखेचा धुरळा नाका तोंडात जाऊन अधिकच धाप लागत होती. वाटेत प्रेत्यकजण लोटांगण घालत होता. आमच्या बॅच मधिल ओंकार थकल्यामुळे मागे पडला... त्याला सोबत म्हणून मी मागे राहिलो. काही वेळाने पुढे गेलेले मेंम्बर साद देईनासे झाले. त्यात मागे राहिल्यामुळे आम्ही वाट चुकलो... कडक उन्ह आणि पाण्याचा कमतरतेमुळे पुढे चालवेना. कधी खोडांच्या सावलीत बसत... तर कधी घसरत, धडपडत अगदी केविवलवाण्या अवस्थेत आम्ही कसे तरी पुढे जात होतो. नशिबाने वाटेत परतणारा वाटाड्या (गुरू) भेटला. त्याने कोयत्याने केळीच्या खोडाची सालं कापून दिली... चव कडू होती पण सालीच्या रसाने थोडा का होईना कोरडा घसा ओला करता आला.





वर पाहिले तर माहुलीची नाळ दुरवर दिसत होती... म्हंटले कसेही करून तिथं पर्यंत जरी पोहचलो तरी धन्य झालो. कारण नाळेत पोहचल्यावर कोणीतरी पाणी आणून देईल अशी वेडी आशा होती. पण कसले काय... आम्हाला सोडून पुढे गेलेले सगळे तिथेच गलितगात्र होऊन पहुडले होते. उन्हातील पदभ्रमणाने अगदी बेजार झाले होते.



संध्याकाळचे ५ वाजत आले होते. अंधार पडायच्या आत ती हजार फुटी नाळ चढून गडावर जायचे होते... मात्र गेले पाच-सहा तासातील अथक परिश्रमामुळे वर चढून जाण्याचे त्राण शिल्लक नव्हते. घश्याला कोरड पडल्यामुळे व त्यातच दुपारचे जेवण न झाल्याने पोट अस्वस्थ झाले होते. डोकं भिरभिरायला लागलं होतं. नाळे जवळ आल्यावर गिरी भेटला. त्याला माझ्या सोबत राहाण्याचे विनविले... म्हंटलं चक्कर आली तर जवळ कोणीतरी जाणकार असावा. :p पण त्यावेळी दोघांची अवस्था एकच होती. कधी हाताच्या जोरावर तर कधी ढोपरांवर रांगत रांगत आम्ही ती नाळ चढू लागलो.



पाणीऽऽ पाणीऽऽ करून घसा अगदी कोरड्या कालव्या सारखा सुकला होता. 'पाणी म्हणजे जिवन' हा पाठ्य पुस्तकांत वाचलेला अर्थ आम्ही प्रत्यक्षात अनुभवत होतो. अंधार पडायला एक तास बाकी होता. वर खिंडीत जाण्या शिवाय गत्यंतर नव्हते... तेथून पुढचा मार्ग सोपा होता आणि पाण्याच टाकंही जवळ होत. मनाची तयारी असली तरी Dehydration मुळे शरीर साथ देत नव्हते.



घळीत मोठमोठे दगड होते... उन्हे कलल्यामुळे थोडे गार होत आले होते... त्या वर उताणी झोपल्या त्यांचा शितल स्पर्श अंगात नवा जोर निर्माण करत होता. त्या जोरावर थोडं वर चढत... परत दगडावर उताणी झोप अस करत नाळेच्या शेवटच्या टप्प्या पर्यंत पोहचलो तेव्हा अंधार पडत आला होता. मात्र शेवटचा दहा मिनिटांचा टप्पा चढणे अगदी अशक्यप्राय वाटत होतं... 'वर गेलेल्यां पैकी कोणी तरी पाणी आणून देईल तरच मी आता वर जाईन, नाहितर रात्र भर नाळेतच मुक्काम ठोकेन' असे जाहिर केले.



एका थोरल्या शिळेवर पंधरा मिनिटांचा ब्रेक घेतल्यावर थोडं बर वाटलं... बजरंगाचे नाम स्मरण करत तडक उठलो नी गिरीला म्हंटले, 'काही झाले तरी खिंड गाठायचीच'... आणि तसेच काळोखात धडपडत उर्वरीत नाळ चढू लागलो. आणि काय नशिब बघा... वर खिंडीत पोहचताच भंडारगडा वरून विश्वेश अमृत कलश घेऊन उतरताना दिसला... शेवटी देवानेच आमची हाक ऐकली... पुढे गेलेला विश्वेश पाण्याने भरलेल्या बाटल्या घेऊन आला... आम्ही एक-एक बाटली गटगट रिकामी केली तेव्हा कुठे क्षुधाशांती झाली. त्या क्षणी मिळालेल्या त्या थेंबन् थेंबाचा मी सदैव ऋणी राहिन.







उशिर झालामुळे ती रात्र गडावर काढली... सकाळी ८ वाजता गड सोडला. माहुलीच्या पायथ्याला महाशिवरात्री निमित्त उत्सव होता... देवळा समोरील विहिरीवर आंघोळ करून शिवशंभोचे दर्शन घेतले.







भटकंतीची आवड तशी महाविद्यालयीन वया पासूनची... सह्याद्रीचे वेड कधी आणि कसे लागले ते आठवत नाही... आप्पांच्या पुस्तकातून तर कधी महारांजाच्या शौर्य कथातून तो सतत भेटत राहिला... आव्हान देत राहिला.. स्फुरण चढत गेले... गेल्या दहा वर्षाच्या गिरिभ्रमणात बरेच अविस्मरणिय क्षण जगलो... शिकलो.

गिरिभ्रमण म्हणजे हवापालट, निसर्गसौंद्रर्य, वन्य जिवन, गड किल्ले, साहस इत्यादी पुरता मर्यादीत न रहता, निसर्गाशी एकरूप होत साधं सोप सात्विक जिवन जगणं... हा गुरुमंत्र सह्याद्रीने दिला.







फक्त चढ म्हणा! (अलंग - मदन)





'कळसुबाई' पट्ट्यात 'अलंग-मदन-कुलंग या त्रिकुटाने आपल्या आकारमानाने आणि प्रस्तारोहणाच्या अजब प्रकाराने आपला वेगळाच दबदबा निर्माण केला आहे.







हरिश्चंद्रगड ही ट्रेकर्सची पंढरी... तर AMK म्हणजे मोक्ष!







गेल्या १० वर्षात खडतर ते चिरकूट प्रकारातले बरेच ट्रेक झाले... मात्र कठिण श्रेणीतील 'अलंग-मदन' केल्या शिवाय मोक्षप्राप्ती मिळणार नाही याची खात्री होती. यंदाच्या मोसमात तो योग साधायचाच हे मनाशी पक्क केलं होतं आणि निमित्त साधाले ते ऑफबिट सह्याद्रीच्या साथीने.







१६ ऑक्टोबरला मेल बॉक्स मधे योरॉक्सचा "Ready for Trek" चा खलिता आला... कधी, कुठे, कसे यावर खलबत झाल्यावर १० आणि ११ डिसेंबरचा दत्त पौर्णिमेचा मुहुर्त ठरविण्यात आला. लौकिकपात्र टांगारुंनी आधीच हात वर करुन वेळीच शरणागती पत्करण्यात धन्यता मानली... तरी ही इतर मायबोलीकरांचा जोश काही कमी झाला नव्हता. नेहमीचे उत्साही धारकरी नविन गिलबिले, गिरिविहार, विनय भिडे, डेविल, प्रवण कवळे, योरॉक्स, रोहित मावळा, प्रसाद गोडबोले, आका (आनंद) आणि अस्मादिक अशी मायबोलीकरांची तुकडी सज्ज झाली... तिला साथ लाभली ती बोनी (प्रणवचा मित्र), केके (योरॉक्सचा सहकारी) आणि प्रथमेश (प्रगोचा मित्र).







शुक्रवार ९ डिसेंबरला शेवटची कसारा लोकल पकडून घोटी मार्गे पहाटे पर्यंत आंबेवाडीत पोहचायचे होते. पुर्वतयारीचा अंदाज घेण्यासाठी संध्याकाळ पासूनच प्रत्येकाचे मोबाईल रिंगू लागले. पुपो, सूप, ठेपले, चटणी, ब्रेड, जॅम, चमचा, वाटी, मॅट, फ्लोटर वैगरे गोष्टींवर खल झाला. रात्री बोरिवलीहून निघालेली पहिली तुकडी दादरला भेटली आणि मग पुढे भांडूप, मुलुंड, डोंबिवली असा लवाजमा गोळा करत निघाली ती थेट कसार्‍याला. तसा हा अडीच तासाचा कंटाळवाणा लोकल प्रवास पण जेव्हा सगळे इरसाल मायबोलीकर एकत्र भेटतात तेव्हा हेच अडीच तास अगदी धम्माल मस्तीत निघून जातात... इतके की कल्याण नंतर झोपा काढू म्हणणारे परत उठून मस्तीत सामिल होतात. कल्याण नंतर थंडीचा जोर वाढू लागल्यावर दारे खिडक्या बंद करून 'होल वावर इज आवर'च्या थाटात फोटो सेशन सुरू झाले.



















सुन्याने कसार्‍याला दोन काळी पिवळीची आधीच सोय करून ठेवली होती. कारण आमच्या सोबत दहा बारा जणांचा आणखी एक ग्रुप होता... गाडी सोडण्या पुर्वी ड्रायवरला कसारा घाटातील आमच्या फेव्हरीट 'बाबा दा धाबा' वर चहा पाण्यासाठी थांबण्याचे सुचित केले. मध्यरात्री साडे तीनला धाब्यावर पोहचताच गिरिने गेल्या वेळचे रु.५७८/- चे बिल दाखवून तीच ऑर्डर रिपिट करण्याचे फर्मान सोडले. ४ डाल फ्राय, १२ रोट्या आणि २३ चहा :p पोट आणि मन दोन्ही समाधानी असेल तरच ट्रेक सत्कारणी लागतो हे ब्रिद वाक्य पुन्हा एकदा खरे करुन दाखविले.







प्रचि: प्रणव











तुडुंब भरलेल्या गाड्या आंबिवली गावात पोहचल्या तेव्हा पहाटेचे साडेपाच वाजले होते. आमच्या आधीची पहिली बॅच मध्यरात्री पोहचली होती. त्यांनी रात्रीच गडाकडे कूच केली होती. दूर डोंगरात लूकलूकणारे टॉर्च त्यांच्या सलामतीची ग्वाही देत होते. पहाटेच्या गारव्यात निसर्गाच्या गप्पा मारून झाल्या... झुंजूमुंजू होताच आम्ही गडाकडे कूच केली. वाटेत ओळख परेड पार पडली. दुसर्‍या ग्रुप मधिल बहुतेकांचा हा पहिलाच ट्रेक आहे.. हे कळल्यावर आम्ही धन्य झालो.











पायथ्याकडची वाट तशी सोपी होती पण ते अलंग मदनचा पॅच कसा काय पार करणार या बाबत आम्ही चिंता व्यक्त केली. आमच्यातील 'यो'चा सहकारी 'केके'चाही हा पहिलाच ट्रेक होता. सगळ्यांना शुभेच्छा देऊन पुढे मार्गस्त झालो. गडाच्या डावीकडील सोंडे वरुन आरामात वाटचाल करत पुढे निघालो. डावी कडच्या एका कड्यावर नेढे होते... त्याचा आकार हत्ती सारखा भासत होता.



















आठच्या सुमारास मधल्या टप्प्यावर पोहचलो. तिथे ऑफबिटने दिलेला सकाळचा इडली-चटणीचा नाष्टा आटोपून पुढे अंतिम टप्प्याकडे सरकलो.















एव्हाना अंतिम टप्प्यातील चढ स्पष्ट दिसू लागला होता.... पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची जाणिव होऊ लागली.















वाटेत ठिकठिकाणी काटेरी वनस्पती हाता पायांचे लचके तोडत होती. पुण्या वरुन आलेले दोन ट्रेकर्स फक्त बर्मुड्यावर गड चढत होते. त्यांच्यावर त्या काटेरी वनस्पतीने फार फार प्रेम केले. बिच्चार्‍यांचे हाल बघवत नव्हते.















पायथ्या पासून अलंगच्या पहिल्या गुहे पर्यंत पोहचायला आम्हाला अडीच तासाचा अवधी लागला. गुहेच्या उजवी कडे आधी २० फुटाचा रॉक पॅच होता... तो पार केला की पुढे ९० फुटाची सरळसोट कातळ भिंत चढून वर जायचे होते. पण तो कार्यक्रम संध्याकाळी करायचा होता. कारण अलंग वर व्हेज बिर्यानीचा बेत होता. त्यामुळे दुपारी ४ पर्यंत अलंगच्या डावीकडील मदनगड सर करुन यायचे होते. गुहेत सॅग ठेवून थोडी विश्रांती घेतली आणि डावी कडिल मदनच्या वाटेला लागलो.















अलंगच्या कड्याला बिलगून एक वाट पुढे डावी कडे मदनगडाला जाते... या वाटे वर ही काटेरी झाडं स्वागताला उभीच होती. डावी कडे अलंग कडा तर उजवी कडे साधारण बाराशे फूट खोल दरी! थोड्याच वेळात आम्ही अलंग आणि मदनच्या घळी मधे पोहचलो...























तिथून कुलंगचा पुर्वेकडील भाग दिसू लागला. थोड पुढं गेल्यावर मदनच्या एका पॅच वर दोर लावल्याचे दिसले... तसा तो पॅच रोप शिवाय पार करता आला असता... पण तिथे अतिआत्मविश्वासाने आधीच एकाचा बळी घेतला होता.... म्हणून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खबरदारी घेणे गरजेचे होते. तो पॅच पार करून पुढे गेल्यावर कुलंगनचा आडवा पसारा दिसला. त्या पसार्‍यात एक ग्रुप गडावर जात होता. त्यांना पाहून गेल्या वर्षी आम्ही या उत्तरकडिल वाटेने वर गेलो होतो त्या आठवणी जाग्या झाल्या.























याच साठी केला होता अट्टाहास... ती वेळ आता जवळ येऊन ठेपली होती. मदनच्या त्या चाळीस फुट रॉक पॅच खालील पायर्‍यांवर येऊन पोहचलो होतो. जेथे आम्ही अनुभवणार होतो Rock Climblingचा तो पहिला थरार...



















"Belay tight..........."



भूषणने (Offbeat Leader) वर बघत आरोळी ठोकली... आणि इकडे माझी हवा टाईट झाली... साधारण तीस चाळीस फुटाचा रॉकपॅच चढण्याचा पहिलाच अनुभव तो... आत्मविश्वासात तसू भरही कमतरता नव्हती... तरी पण झेपेल ना? असे आत्मघातकी विचार डोक्यात येऊ लागले... काय करणार कारणही तसेच होते... काही वेळा पुर्वीच आमच्यातील एका मावळ्याचा धीर खचल्याने त्याला धडपडत खाली उतरताना पाहिले होते. त्यातल्या त्यात एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे Belayचा रोप वर सुन्याच्या हातात होता.







तत्पुर्वी मायबोलीकरांची १३ जणांची टिम मदनगडाच्या त्या सुप्रसिद्ध चाळीस फुटी रॉकपॅच जवळ येऊन थांबली होती. पॅच जवळची जागा फारच अरुंद होती. चढुन आलेल्या पायर्‍यांवर प्रत्येक जण आज्ञाधारी मुलाप्रमाणे नंबर लाऊन बसून होता. एका climberला पॅच चढुन जाण्यास कमीत कमी १० मिनिटं लागत होती. आमच्या पुढे अजून पहिल्या बॅचचे दोघे- तिघे शिल्लक होते... त्यामुळे आम्हाला कमीत कमी अर्धा तास तरी वाट पहावी लागणार होती. सकाळ पासून केलेल्या डोंगर चढाईमुळे पाय थकले होते. त्यातच समोरील १२०० फुट खोल दरीतून वार्‍याच्या थंडगार झुळुका अंगावर येऊ लागल्या. सुर्य पण विरुद्ध बाजुला असल्यामुळे पायर्‍यांवर सावली होती. त्या थंडगार वातावरणात जर चुकून डोळा लागला तर थेट कुलुंगचा पायथा, असा हिशोब मांडून आम्ही मोकळे झालो.















मदनच्या Rock climbing साठी Single Rope System वापरण्यात आली होती. या पद्धतीत climberची सुरक्षितता ही फक्त एकाच रोपवर अवलंबून असते. ४० फुटाचा पॅच असेल तर रोपची लांबी कमीत कमी ८० ते १०० फुट असावी लागते. ज्याचे दुसरे टोक खाली सोडलेले असते. चढताना जिथे हाताची पकड अशक्य असते त्यावेळी रोपचे दुसरे टोक आधारासाठी वापरता येते.















next मायबोलीकर... झिनतने (Offbeat Leader) पुकारा केला... तसा उठून मी Harness चढवून सज्ज झालो... Belay Harnessला Anchor करुन झाल्यावर भूषणने आरोळी ठोकली.







Belay tight...........



OK.......... वरुन सुन्या उत्तरला... आणि कमरेला बांधलेला Harness कचकन आवळला गेला. Belayचा रोप वर सुन्याच्या हातात होता आणि तोच एकमेव आमच्या सुरक्षिततेचा दुवा होता. डाव्या हाताचा रोप फक्त दगडावरची पकड सुटली तरच आधारासाठी वापरायचा होता. एक-दोन-तीन करत पाच एक फूट वर गेलो असेन नसेन तो हाताला खाच सापडेनाशी झाली... खालून लिडरचे instruction देणे सुरू झाले... डावी सोड... उजविकडे पाय टाक... मनात म्हटले पाय टाकायला आधी पाय तर दिसला पाहिजे... नंतर खाच बघू... खाली बघुन मला धीर गमवायचा नव्हता... तिच्या सल्ला नुसार पाय तसाच ९० अंशात वर उजवीकडे उचलून एका निमुळत्या खोबणीत अडकवला... पण त्यामुळे शरिराचा भार वर उचलणे कठीण झाले... सुन्याने ते बरोबर हेरले आणि लगेच belay वर खेचला... आणि त्याच बरोबर मी हवेत काही फूट वर उचललो गेलो... एव्हाना पोटातला गोळा पायांकडे सरकला होता... शरिराचा पुर्ण भार हातांवर पेलत वर चढण्याची कसरत म्हणजे Rock Climbing हे माहित होते... पण ऐन मोक्याच्या क्षणी हातापायांचा मेळ बसणे फारच कठीण... डावी उजवी करत करत शक्य तेव्हढा भार हातावर पेलत कड्याच्या मधोमध येऊन पोहचलो आणि अचानक हातातील ताकद गेल्या सारखे वाटले... तेव्हा 'हतबल'चा शब्दशः अर्थ उमगला. नशिब वर सुन्या दिसत होता आणि दहा पंधरा फुटाचा पॅच बाकी होता... सुन्याने वरुन instruction देणे सुरु केले आणि नवा जोम अंगात संचारला... त्याच्या सुचनां नुसार वर न दिसणार्‍या खाचां मधे हात घालत कसेबसे वर चढून सुन्याचे चरण कमल स्पर्श केले...















वर पोहचलेल्या सगळ्या मायबोलीकरांची अवस्था काही वेगळी नव्हती... सगळे जण कुसुमाग्रजांची माफी मागून एकच ओळ आळवित होते.













पाहुन थोरला प्रस्तर तरी मोडला नाही कणा



पाठीवरती सॅग ठेवून फक्त चढ म्हणा!













मदन गड तसा आकाराने लहान... रॉकपॅचची परिक्षा देऊन गडाच्या शेंड्याकडे निघालो. मदनच्या सुळक्याला उजवी कडे ठेवत पुढे गेल्यावर डाविकडील अलंगचे इंग्रजीतील 'C' आकारातील दर्शन होते. अलंगच्या माथ्या वरील गुहा, राजवाड्याची भिंत इथून अस्पष्ट दिसते. थोडावेळ तिथेच घुटमळून वर जाण्यास निघालो. शेंड्याकडे जाण्यासाठी कातळ कड्यात कोरलेल्या पन्नास एक पायर्‍या चढून जावे लागले. शेंड्यावर फक्त पाण्याचे एक टाके आणि एक गुहा एव्हढाच काय तो जामनिमा शिल्लक आहे. मदनच्या उजविकडून कुलंगचा दक्षिणेकडील परिसर नजरेस पडतो. त्या कडेकपार्‍यांतून बरीच गिधाडे विहाराताना दिसत होती. तिथेच एका उंचवट्यावर उभ राहुन उडी उडीचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला... पण दुपारच्या उन्हामुळे कोणालाच त्यात रस उरला नव्हता. थकलेले काही जण तसेच उन्हात पडून राहिले. उन्हाचा त्रास सोसेनासा झाल्यावर सगळ्यांनी परतीचा मार्ग धरला... काही वेळा पुर्वीच धडाधड पायर्‍या चढून आलेलो... आता उतराताना मात्र फाफलत होती. पायर्‍यांचे कोरिव काम करणार्‍या कारागिरांना कंटाळा आला म्हणून की काय त्या पायर्‍यां जवळील कातळ कड्याचा काही भाग बहिर्वक्र पद्धतीने कोरला होता. त्यामुळे सुटलेल्या पोटाबांना त्याचा त्रास होऊ लागला... चढाई पेक्षा उतरण्याला दुप्पट वेळ लागला. पुढे अलंग कडील वळणावर थोडा वेळ दगड-मातीने अग्नी परिक्षा पाहिली.























परतून आम्ही त्या चाळीस फूटी रॉकपॅच जवळ आलो. एव्हाना सगळ्यांचा जठराग्नी चांगलाच भडकला होता... थेपले, कचोरी, शंकरपाळ्यांची त्यात आहुती देण्यात आली. आमच्या सोबत आलेल्या दुसर्‍या ग्रुप मधिल दहा-बारा शिलेदारांचा तो रॉकपॅच चढाईचा कार्यक्रम बाकी होता. वरचा मावळा खाली गेला की खालचा वर असा वेळखाऊ कार्यक्रम सुरू होता... सावली आणि गार हवेमुळे बसल्या बसल्या सगळ्यांनी तिथेच पथारी पसरल्या..







Lower Down Systemने पॅच उतरायला केवळ ५ मिनिटं लागत होती... पुर्वीचा वॉटरफॉल रॅपलिंगचा अनुभव पाठिशी असताना आमच्या साठी ते सोप्पे काम होते. उरताना सगळ्यांच्या कॅमेर्‍यांनी मनसोक्त क्लिकक्लिकाट करून घेतला.



प्रचि : Yo Rocks





खाली येऊन बराच वेळ वाट पाहुन सुद्धा वरचे मावळे उतरेनात... तेव्हा कंटाळून आनंद, मी आणि केके अलंगच्या गुहे कडे निघालो. गुहेत जाऊन थोडासा फराळ केला. बाकीचे मायबोलीकर येईपर्यंत आराम करण्याचा इरादा होता. परंतू लिडर लोकांना लवकरात लवकर सगळ्यांना अलंगवर पाठवण्याची घाई होती. काहीश्या नाराजीने सॅग पाठिवर टाकून उठलो. उजविकडे लगेच एक रॉक पॅच लागला. त्या पॅचवर गावाकर्‍यांनी तार ठोकून ठेवलेली होती. तो पॅच पार करून गेल्यावर दम काढणारा अलंगचा ९० फुटाचा कातळ कडा दिसला.







इथे एक चांगली गोष्ट दिसली ती म्हणजे प्रस्तारोहणासाठी रोपची शिडी लावलेली होती. त्यामुळे वेळ तर वाचणार होताच शिवाय मेहनतही कमी करावी लागणार होती. आधी आमच्या सॅग वर गेल्या नी मग सॅगचे मालक... Harness आणि Belayची जुळवाजुळव करून शिडीला हात घातला... लगेच लिडरने दुरुस्ती सुचविली... दोन्ही हात शिडीच्या पायरी वर न ठेवता रोपच्या डावी उजविकडे पकडत वर जाण्यास सांगितले... जर त्या विस पंचविस पायर्‍या तशाच पकडून वर गेलो असतो तर हाताची बोटं कड्यावर आपटून रक्तबंबाळ झाली असती... झपाझप पाय उचलत पंधरा एक पायर्‍या एका दमात वर चढून गेलो... त्यामुळे प्रस्तारोहणाचा थरार मात्र कमी झाला होता... मात्र अर्ध्या अधिक पायर्‍या चढून गेल्यावर दम लागलाच. काही क्षण तसेच शिडीवर लोंबकळत राहोलो... थोडा दम खाऊन पुन्हा पायर्‍या चढण्यास सुरवात केली.... जस जसे वर सरकू लागलो तसे एक फुट अंतर असलेल्या पायर्‍यांची लांबी आमच्या वजनाने दोन फुटच्या वर होऊ लागली... एक एक पायरी वर चढताना बरिच कसरत करावी लागत होती. अंतिम टप्प्यात Belayerलाच जोर लाऊन वर खेचून घ्याव लागलं.











दिवसभर दोन्ही पॅच वर अशी खेचाखेची करणार्‍या त्या सगळ्या Belayer च्या हातांना सलाम. Hand Gloves घालून सुद्धा त्यांच्या हातांची आगआग होत होती. तो कठिण पॅच सर करून आल्यावर लिडरने उजविकडिल गुहेकडे बोट दाखविले... बघतो तर काय गुहेत सरपण आणि सॅग ठेवलेल्या दिसल्या... म्हणाला, ते सगळे वर घेऊन जायचे आहे. ते ऐकताच शरिरातील उरला सुरला सगळा त्राण गळून पडला... त्याला म्हटले, आधी जे वर गेले आहेत त्यांना बोलावून आणतो... नी मग सगळ्यांची साखळी करून सॅग आणि फाटी वर पोहचवतो. त्या पॅच नंतरचा अलंग वर जाण्याचा रस्ताही मदन सारखाच अरुंद पायर्‍यांचा होता... उजविकडे कडा नी डाविकडे दरी!











वर जाऊन पाण्याच्या टाकी शेजारी सॅग ठेवल्या आणि आराम फर्मावत बसलेल्या शिलेदारांना पायर्‍यांकडे चलण्याची विनंती केली. तो पर्यंत मायबोलीकरां पैकी एक एक जण वर येऊ लागला होता. सगळे थकले भागले जीव पायर्‍यांवर ओळीत बसले... साखळी करून गुहेतील सॅग आणि सरपण वर पोहचवे पर्यंत संध्याकाळ दाटून आली होती. तांबड्या पिवळ्या रंगाची रजई ओढून सुर्व्या निजायला चालला होता... या दुनियादारीत मात्र आमचा सुर्यास्त हुकला होता. पण त्याचे कोणालाच वाईट वाटत नव्हते. कारण... 'उगवला चंद्र पुनवेचा'.







गडावरून चंद्रग्रहण पाहण्याची ही माझी दुसरी वेळ... पहिल्या वेळी राजगडावर चंद्रग्रहाणाचा नजारा पाहिला होता पण त्या वेळी सोबत कॅमेरा नव्हता. आता मात्र मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा घेत निवांत पणे फोटोसेशन सुरू केले...

'ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा'......







गुहेत चुल पेटवली तर धुराचा त्रास होतो... म्हणून चूल उघड्यावर पाण्याच्या टाकी शेजारी मांडली होती. व्हेज बिर्याणीचे सामान गोळा झाल्यावर सगळे मदतीला बसले. कांदे चिरण्यातील नविनचा सराईत पणा पाहून जमलेल्यांच्या डोळ्यात पाणी आले... बटाटे, टॅमेटा, गाजर, कोंथबिर सगळा सरंजाम तयार झाला.







चुलीवर बिर्यानी सोबत पापडांचा फक्कड बेत जमून आला होता... तर वर नभमंडळात त्या लाडक्या मामाने आपल्या कलांचा खेळ सुरू केला होता. संध्याकाळचा अल्हाददायक वाटणारा गारवा रात्र चढू लागल्यावर अंगात कुडकुडी भरवू लागला. लिडर लोकांनी कॅंम्प फायर साठी जागा मोकळी केली आणि तिथेच रिंगण घालून आमची पंगत बसली. थंडीमुळे कधी एकदा जेवतो आणि आडवा होतो हा एकच विचार सगळ्यांच्या मनात घोळत होता. गरमा गरम बिर्यानी संपवे पर्यंत चंद्रग्रहण सुटू लागले होते. हात धुण्याचे कष्ट जिवावर आले होते म्हणून तसेच बाजूला हात साफ करुन गुहे कडे धूम ठोकली.







गुहा अगदी ऐसपैस होती... एक हॉल... एक किचन दोन बेडरुम तर दोन मास्टर बेड रुम... घोरंदाजांचा त्रास नको म्हणून मी, गिरी, विनय, आनंद आणि डेविलने मास्टर बेड रुम मधे बस्तान बसवले. एव्हढ्या मोठ्ठ्या गुहेत जेमतेम २०-२५ जण होतो... गुहेत माती फार होती, सहाजिकच त्यामुळे धूळ उडून त्रास होत होता. सोबत आणलेले वर्तमान पत्र खाली पसरून त्यावर मॅट टाकल्या... ज्यांनी मॅट आणली होती त्यांची चिंता नव्हती... पण आमच्या सोबत आलेल्या नविन ट्रेकर्सची पंचाईत नको म्हणून मी मॅट सोबत TNTचे गोणते घेतले होते... सगळी आवरा आवर करुन अकराच्या सुमारास घोर्‍यांची समाधी लागली.







साडे चारला जाग आली तेव्हा अस्मादिक खाली आणि मॅट डोक्याच्या वर असला विचित्र प्रकार घडला होता. जल्ला पिलास्टिकच्या गोणत्यावर झोपल्यावर असेच व्हायचे म्हणत परत वर जाऊन झोपलो... पहाटे साडेपाचला हिमेस भाईंला कळ लागली तसा तो कोणाच्या तरी भ्रमणध्वनीतून बोंम्बटू लागला...उठून बसलो तर गुहेतून बाहेरील चंद्राचा दुधाळ प्रकाश दिसत होता. धन्य त्या गायनी कळांनी शेजारी झोपलेला आनंदही उठला... खालच्या बेड रूम मधले आणखी दोघ-तीघे उठले... असे करत सगळ्यांनी कळीचा मुद्दा उचलून धरला... नी मग वरात निघाली ति अलंगच्या टाक्याकडे... मात्र टाक्याकडे जाताना कळीचा मुद्दा बाजूला सारून यो आणि गिरीने आवाज कुणाचा या वर चर्चा सत्र भरवलं... कालच्या श्रमाने थकले भागले जिव ढाराढूर झोपले होते... आम्हाला ना आवाज उठवू शकत होता ना वाघ!







पाण्याच्या माग काढत बरच वर जावे लागले... पुर्वेकडील क्षितीजावर त्या दिनकराने सवई प्रमाणे आपला रंगीत पसारा मांडण्यास सुरवात केली होती. अलंगच्या पुर्वेला असलेल्या घनचक्कर, आजोबागडा मागून दिसणारा सुर्योदयाचा नजारा पाहण्यात आम्ही दंग झालो... घाटघर धरणातील पाण्याने केशरी रंग परिधान करे पर्यंत आम्ही सुर्योदयाचा तो रंगित नजारा न्याहळत बसलो.











माघारी फिरून येताना पडलेल्या राजवाड्याचे अवशेष दिसले. राजवाड्या मागे दिसणारा ऐटदार कुलुंग पहाटेच्या उन्हात न्हाऊन निघत होता.







लवकर नाष्टा उरकून परतीला लागू म्हणजे चारची कसारा लोकल गाठता येईल... मागे राहिलो तर इतर ग्रुप सोबत गड उतरायलाच चार वाजतील असे समिकरण मांडून आम्ही गुहेकडे परत आलो. सॅग उचलून तसेच सगळे रामोशी खाली चुली पाशी आलो... तिथे चहा आणि मॅगी तयार व्हायला बराच वेळ होता... हातात वेळ असला की, मग एकेकाला नको नको ते उद्योग सुचतात... आनंदने ब्रेडचे स्लाईस चुलीवर भाजून दिले... चुलीवर खरपूस भाजलेल्या ब्रेडला जाम लाऊन खाल्ले... ती चव म्हणजे... अऽह्हाऽ! सोबतीला यो ने आणलेले खसखस, रामोच्या पुपो, चिवडा, थेपले, केक आदींचे मार्केटिंग सुरू होते... डेविलने रात्रीचे शिल्लक राहिलेले हिरवे वाटाणे मॅगीत टाकले तर कच्चे बटाटे चुलीत... :p









नाष्टा आटोपून आम्ही खाली अलंगच्या कड्या जवळ आलो. लिडर लोक्स रोप लावण्याच्या कामात गुंतले होते. तो पर्यंत काही जण समोरील दरीचे चित्रीकरण करण्यात सगळे गढले... तर गुहेतील बाकीचे Harness चढवून आपल्या नंबरची वाट पहात बसले...











रॅपलिंग करण्याचा पहिला आणि शेवटचा मान नविनला मिळाला... कारण रॅपलिंग करत खाली उतरायला वेळ लागत होता. रॅपलिंगचा सेटअप काढून मग Lower Down चा सेटअप लावला... तसे धडाधड सगळे खाली उतरू लागले... खाली खोल दरी असल्यामुळे पहिल्यांदा कड्यावर मागे झुकताना फार भिती वाटत होती... पण मागे झुकल्या शिवाय बिले वर वजन पडून खाली जाता येणार नाही याची जाणीव होती... कड्याचा तो पहिला टप्पाच फक्त थरकाप उडवणारा होता... एकदा का कडेलोट झाला की मग सगळेच सोप्पे... सरसर करत दोन मिनिटांत खाली... विनयची Lower Down करतानाची कसरत.















तो ९० फुटाचा पॅच पार केल्यावर लगेच एक २० फुटाचा पॅच कमरेला दोर लाऊन पार केला... आणि मग सुसाट सुटलो... जल्ला उतरताना परत एकदा काटेरी झुडपांनी गतिरोधकांची भुमिका पार पाडली... एका सुकलेल्या व्हाळात बसलो... मस्त लिंबू मारके भेळ बनवून खाल्ली... पुढे निघालो ते... धडपडत... घसरत... फोटो सेशन करत.. दोन तासात पायथ्याला पोहचलो.















गावातील एका गावात ऑफबिटने जेवणाची सोय केली होती... गेल्या गेल्या त्यांच्याकडे जेवणाचा तगादा लावला... तो पर्यंत आम्हाला कसार्‍याला घेऊन जाणारा ड्रायवर घोड्यावरून हजर झाला... "जेवण सोडा आधी गाडीत बसा!" काय म्हणाव या ड्रायवरला... विनयने त्याची समजूत काढली, "पाच मिनिटांत जेवतो आम्ही... तुम्ही दोन मिनिटांत परत या".. जेवण वाढेपर्यंत सगळ्यांनी आपले माय मोकळे करून घेतले... तर नविनने चक्क अंगणातच अंग टाकून दिले.







पिठलं-भात आणि चटणी... फटाफट उरकून गाडीकडे निघालो... पण चालक आणि गाडी दोन्ही गायब!... जल्ला काय लोचाय? सुन्याला फोन लावा... प्रितीला फोन लावा... मोबाईलची रेंज आहे का? अरे माझ्या आहे पण वर सुन्याच्या मोबाईलला रेंज नको का?... तुम्ही लईच इनोद करता राव...



वाट पाहुनी जिव शिणला गाड्यां मागून गाड्या गेल्या... गावकर्‍यांना एस्टी बद्दल विचारले तर उत्तर मिळाले.... "रयवारच्याला कधी येते तर कधी न्हाई येत".







दोन तास वाट पाहिल्यावर मागिल ग्रुप येऊन आम्हाला मिळाला... पण गाडीचा काहीच पत्त्या नव्हता... मरगळलेल्या लोकां समोर मग योरॉक्सने 'दाखवण्याचा' कार्यक्रम पार पाडून घेतला. :p जल्ला काय सांगू... 'यो'च्या हातच्या चहाची सर कश्शा कश्शाला म्हणून नाय...







प्याऽपीऽ करत कालच्याच दोन काळ्यापिवळ्या आल्या तसे लगेच सामान चढवून आम्ही सुन्याचा आणि ऑफबिटचा निरोप घेतला. ६.२०ची कसारा लोकल मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या. ड्रायव्हरनेही बरोबर वेळेत १० मिनिटं आधी कसारा स्टेशनला पोहचवलं... लोकल आधीच लागली होती त्यामुळे आता खरी परिक्षा होती ती जागा पटकवण्याची... कुलुंगच्या ट्रेकचीच आयडीया इथे सुद्धा वापरली... माल डब्ब्यात अतिक्रमण करुन भैय्याचा ठेला एका बाजुला सारला... गिरिची मॅट आणि वर्तमान पत्र खाली पसरून प्रत्येकाने तळ ठोकला... वडे, समोसे खाऊन घसा गरम करून घेतला नी मग सुरू झाली ती मंगल गाणी दंगल गाणी!



प्रचि : प्रणव