शनिवारी ७ वाजता कर्जत गाठले आणि कोंडिवडेसाठी सहा आसनी रिक्षाची वाट पहात बसलो, पण उशीर झाल्याने त्या वाटेला कोणीच जाणार नाही असे समजले. नशीबाने ८.४५ची महामंडळाची गाडी पकडून खोपड्याला उतरलो... कोंढाणा गावतल्या एका रहिवाश्याच्या सोबतीने कोंडीवडे गाठले.
कोंडिवडेत राहण्याची उत्तम सोय आहे, आम्ही गजानन देशमुखांकडे तळ ठोकला. कोंडीवडे ते राजमाची वाटेत बरेच फ़ार्म हाऊस आहेत. देखमुखाने त्यांच्याच नविन भांधलेल्या घरात रहाण्याची सोय केली तेव्हा फ़ार आनंद झाला, परंतु त्यांच्या इमानदार प्राण्याला आमचा आनंद काही पहावला नाही. पाहुण्यांच्या कुशीत झोपण्याच्या त्याच्या वाईट खोडीमुळे आम्हाला रात्रभर जागता पहारा ठेवावा लागला.
संध्याकाळी लवकर मुंबई गाठायची असल्यामुळे पहाटेच ट्रेकला सुरवात केली. देशमुखांच्या कुत्र्याने कोंढाणाच्या हद्दीपर्यंत सोबत दिली... उल्हास नदीच्या पात्राला लागून असलेला कोंढाण्याचा परिसर आणि समोरच्या डोंगरातून उतरणार्या रेल्वेगाड्यांचे दृष्य मनाला भुरळ पाडत होते.
मुख्य रस्ता सोडुन आम्ही राजमाचीचा मार्ग जवळ केल्यावर काही क्षणात वाट चुकल्याची खात्री पटली. वाट चुकल्याशिवाय ट्रेकला मजाच नसते हे जरी खरं असलं, तरी नंतर मात्र ती डोकेदुखी ठरू शकते. पहाटेच बाहेर पडल्याने ना कोणी वाटसरू ना वाटाड्या भेटला. चुकत चुकत १.३० तासात गुहे जवळ पोहचलो. ही गुहा म्हणजे सातवहानांच्या काळातील शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुनाच होता. आत भग्न अवस्थेत काही अवशेष दिसत होते. गुहेत राहण्याची सोय आहे, परंतु काही बेशिस्त पर्यटकांमुळे तेथे दुर्गंधी पसरली आहे. गुहेवरुन कोसळणार्या धबधब्याचा नयनरम्य देखावा कॅमेर्यात बंदिस्त करुन पुढे निघालो, रस्त्यात एक ग्रुप भेटला पण तोही गुहेच्या दिशेने वाटचाल करत होता.
गुहेतील चहावाल्याने पुढल्या वाटेचे मार्गदर्शन केले. ओढा पार करुन आम्ही पुढे सरकलो, काही ठिकाणि ट्रेकर्सच्या पावलांची निशाणे दिसत होती, त्यावरुन स्वर्ग गाठायचा अयशस्वि प्रयत्न करत निसरड्या दरडीपाशी येउन थबकलो. त्यातच एका मित्राने फ़्लोटर्सचे निमित्त करून पाय वर केले. पुढे एका ओढ्याला बगल देऊन वर जाण्याचा प्रयत्न केला. समोर बालेकिल्ला दिसत होता पण चुकिचा मार्ग पत्करल्याने आणि वेळेचे बंधन असल्यामुळे तेथे जाणे शक्य नव्हते.
थोडावेळ टंगळ मंगळ करून खाली जाणार्या बाण निर्देशांचे पालन करत उल्हास नदिच्या पात्रात उतरलो. तेथे काही पर्यटक राफ़्टिंगचे कौशल्य दाखवण्यात गुंतले होते. आम्हालाही ती हौस भागवण्याची फ़ार इच्छा झाली, पण ते खजगी राफ़्ट असल्याचे कळले.
परतीच्या मार्गावर असताना पावसात मनसोक्त भिजुन घेतलं. १.०० वाजता देशमुखांकडे गरमा गरम जेवण घेउन २.१५ ला कर्जत गाठले.
No comments:
Post a Comment