Monday, December 13, 2010

सिद्धगड

मायबोलीवर GS1 याने लिहिलेला सिद्धगडचा वृत्तांत...

ट्रेकिंगमधल्या कसलेल्या सिद्धांचा गड तो सिद्धगड असे वर्णन वाचले होते सिद्धगडाचे, त्यामुळे तिकडे जाण्याचे बरेच दिवस मनात होते. पण दोन दिवसांचा हा ट्रेक एका दिवसात वा रात्र-दिवसात कसा बसवावा असा प्रश्न होताच.

शनिवारी १ जुलैला आम्हाला नारिवली या गावी जायचे होते. तिथे कर्जतहून जाणे हे पुणेकरांना जवळचे आहे पण तशा सोयीस्कर बस नाहीत संध्याकाळी पाचनंतर.

तुफान पाउस पडत होता. घाटात तर खिडकीबाहेर ढगांशिवाय काहीच दिसत नव्हते. गप्पा गप्पात कल्याण आले. खचाखच भरलेल्या एस्टीत आम्ही आठ जण शिरलो, नऊला मुरबाडला पोहोचलो. आमची नारिवलीला जाणारी शेवटची एस्टी अगदी पाच मिनिटांनी चुकली. पण मोठा गट असल्याचा फायदा असा झाला की लगेच एक खाजगी जीप घेऊन पुढचा प्रवास सुरू केला. वाटेत म्हसा लागले आणि गोरखगडाच्या वेळेला मध्यरात्री म्हसापर्यंत केलेली पौर्णिमेची पायपीट आठवली.

नारिवली गावात पोहोचलो. गावच्या देवळात सत्संग चालू होता. देउळ अगदी प्रशस्त होते. सत्संग आटोपल्यावर गावच्या मुलांनी अगत्याने चौकशी केली, कळशी भरून पाणी आणून दिले. झोपायला देवळातलीच मोठी चटई वापरायची परवानगी दिली, लागल्यास समोरच्या घरातून पाणी घेता येईल असे सांगितले आणि आमची व्य्वस्था झाली आहे हे बघुनच मग ते घरी गेले. देवळात एक स्वामीजी पण होते मुक्कामाला.

रात्रीचे फारसे जेवायला आणले नव्हते. पुऱ्या, भेळेचा फराळ पार पाडला आणि सकाळी लवकर उठायचे एकमेकांना बजावत झोपी गेलो. थोडा अंधार आणि शांतता होते तोच आरतीच्या किंकाळीने सर्व जण एकदम उठून बसले. तिच्या अंगावर सापसदृश काहीतरी येऊन पडले होते. पण चौकशीअंती तो लेदरचा पट्टा निघाला. पाच वाजता उठलो, सर्व आवरून निघेपर्यंत साडेसहा होउन गेले. पाउस अजिबात नव्हता. ओढे, नदी ओलांडत तासाभरात एका मोकळ्या पठारावर आलो आणि डावीकडे मच्छिंद्रगड, गोरखगड, दमदम्या, साखरमाचीचा डोंगर आणि त्यालाच समोर काटकोनात आडवा पसरलेला सिद्धगडाचा पहाड दिसत होता. गडाचा माथा मात्र धुक्यात पूर्ण वेढला गेला होता त्यामुळे आम्हाला गड ओळखता येत नव्हता.
siddhagad



dhukyAt daDalelA siddhagaD

लहानमोठे कितीतरी धबधबे या दोन्ही कड्यांवरून उड्या घेत होते आणि ओढ्यांच्या रुपाने आम्हाला आडवे येत होते.
Mihir

mhorakya - GS

Photobucket

वाट शोधत तसेच थोडे चालत राहिलो आणि आता चुकलो अशी खात्री झाली तेवढ्यात शेतात काम करणारा भरत नावाचा मुलगा भेटला. जवळच त्याचे गाव होते सिद्धगडपाडा. त्याला वाट विचारली तर त्याने वाटाड्या म्हणून मला घेउन चला असा बराच आग्रह केला, तो मोडवेना म्हणून त्याला बरोबर घेउन निघालो. काहीशा नाखुषीनेच घेतलेला हा निर्णय किती योग्य होता ते नंतर पावलापावलाला जंगलात, दरीत अदृश्य होणाऱ्या विविध वाटा बघून कळलेच. आता लगेच पुन्हा गेलो तरी वाटाड्या लागेल एवढा विस्तृत आणि घनदाट असा हा जंगली भूलभुलैय्या आहे. अजून थोड्या वाटचालीनंतर एका टेकाडावरच्या एकुलत्या झोपडीत चक्क चहा मिळायची सोय झाली त्यामुळे सकाळपासून चहाची भुणभूण करणारे चहाबाज बेहद्द खुष झाले.
pAUs

siddhagad

ओढ्यांच्या खळ्खळाटाच्या सान्निध्यात सिद्धगडाचा कडा उजवीकडे ठेवत पुढचा प्रवास सुरू झाला. चांगलाच लांबचा व खडा चढ असलेला पल्ला असला तरी दर दहा मिनिटाला एखाद्या धबधब्यात ताजेतवाने व्हायला मिळत असल्याने मजेत चालत राहिलो आणि अखेर निघाल्यापासून चार तासांच्या मेहेनतीनंतर सकाळपासून दिसणाऱ्या या आडव्या पहाडावर एका दरवाजातून दाखल झालो.
dhabadhabA

कोकणातील किल्ला असला तरी सिद्धगड मुख्य रांगेला अगदी खेटून आहे आणि चार हजार फुटांहून अधिक उंच आहे.त्यामुळे एकंदर दमछाक होतेच. इकडुनच भीमाशंकरला वा मिलींद गुणाजीने नावाजलेल्या घाटवरच्या नितांतसुंदर आहुपे गावाला अवघड घाट चढुन जाता येते.

एवढ्या उंचावरच्या पठारावर दहा पंधरा उंबऱ्यांचे सिद्धगड गाव वसले आहे, जंगल तर आहेच पण भरपूर शेतीही आहे आणि मुबलक पाणी असल्याचा फायदा घेत गाव समृद्ध झाले आहे. थोडे चालून डाव्या बाजूला बघतो तर अजून हजार फूट उंच असा एक कडा उभा ठाकला होता. त्याच्या साधारण मधोमध एक गुहा दिसत होती. सर्वांना फारच भूक लागली होती, पण तरी तिथे पोहोचूनच न्याहारी करावी असे एकमताने ठरले.

उभ्या चढणीच्या वाटेने गुहेत पोहोचलो. अक्षरशः स्वर्गात पोहोचल्यासारखे वाटत होते. खाली नजर जाईल तिथे धुके, ढग, हिरवागार आसमंत, त्यात लपलेली साखरमाची आणि सिद्धगड ही दोन पिटुकली गावे, एवढ्या उंचीवरून अगदी खुजे वाटणारे गोरख-मच्छिंद्रचे सुळके आणि इतर शिखरे. डोळे भरून कितीही वेळ पाहिले तरी हलावेसे वाटणार नाही असा हा देखावा पाहण्यासाठी केलेली पायपीट ही अगदी किरकोळ वाटावी एवढे समाधान मिळाले.
gUhA

मुख्य गुहेचे दार बंद करून तिथे रहाणारे साधूबाबा खालच्या गावात गेले होते. आम्ही अरुंद ओसरीत दाटीवाटीने बसलो. प्रचंड मुसळधार पाऊस सुरू झाला. तशातच बरोबर आणलेल्या घन इंधनाच्या स्टोव्हवर गरमागरम कांदेपोहे केले आणि भुकेले जीव त्यावर तुटुन पडले.

पाउस थांबण्याची वा कमी होण्याची लक्षणे दिसेनात, मग तसेच भिजत मी, कूल आणि मिहिर अजून वर निघालो. वाटाड्याने आमचे मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला, बरीच भीती दाखवली. रस्ता खरच बिकट होता, सुरूवातीला एका धबधब्यातून वर गेलो मग कड्यात कोरलेल्या पायऱ्या तर तरी कधी अरूंद खोबणी, तरी सुदैवाने एवढे धुके होते की मागचे भयंकर एक्सपोजर आम्हाला दिसतच नव्हते. नाहीतर अवघड वाटेपेक्षा ते बघुनच खर तर हात पाय लटपटतात वा डोळे फिरतात. असे बराच वेळ चढलो तरी माथा काही येईना, मग शेवटी तिथुनच सलाम करून परत फिरलो, पण जेवढे गेलो तेवढे सर्वच चित्तथरारक होते.


काळजीपुर्वक उतरलो आणि गुहेपासून बाकी सगळ्यांना घेऊन पावसात भिजतच खाली सिद्धगडाच्या पठारावर उतरलो. गडाच्या दरवाजाजवळच एक मंदिर आहे, तिकडे पुन्हा एकदा आमची चूल मांडली, बाजूला धो धो पाउस, चिंब भिजलेलो आम्ही आणि मग थोड्याच वेळात रटारटा उकळणाऱ्या तांबड्या रश्श्याचा वास आसमंतात पसरला. त्यावर मनसोक्त आडवा हात मारून मंडळी तृप्त झाली. या वेळेपासून ट्रेकदरम्यान सच्च्या डोंगरयात्रीप्रमाणे आपला स्वयंपाक आपणच करायचा असे ठरवले होते तो सगळाच बेत अगदी झकास पार पडला.

मग पुन्हा एकदा रमतगमत परतीची पायपीट चालू केली. गेले चार पाच तास चालू असलेल्या मुसळधार पावसाने सगळे चित्र अजूनच पालटले होते. कड्यावरून मधुर खळखळाट करत उड्या घेणारे ओढे आता घनगंभीर आवाज करत एका लयीत कोसळत होते. सकाळची नदी आता कदाचित पार करता येणार नाही, फार पाणी असेल तर तसा प्रयत्नही करू नका, पाणी ओसरेपर्यंत, सकाळपर्यंत थांबावेही लागेल असा इशाराही वाटाड्याने दिल्यावर तर मीही गंभीऱ झालो. एव्हाना संध्याकाळ झाली होती, वाटाड्याचा सिद्धगड्पाड्याला निरोप घेतला आणि शेवटचा टप्पा भराभर चालू लागलो. एकमेकांना धरून नदी ओलांड्ली, सकाळच्या दोन ओढ्यांच्याही नद्या झाल्या होत्या, त्या ओलांडल्या आणि अखेर अंधुक प्रकाशात नारिवलीला पोहोचलो.

देवळात कपडे बदलले. कर्जतला जाणारी शेवट्ची बस तर केंव्हाच गेली होती, आता मुरबाडला जायला साडेआठला बस. पण तसे मुरबाड-कल्याण-पूणे जाणे म्हणजे जवळजवळ सकाळीच पोहोचलो असतो पुण्याला. शेवटी एक खाजगी जीप कर्जतपर्यंत यायला मिळवली. इंद्र आणि नरेशचा निरोप घेतला आणि कर्जतला गेलो, तिथुन पुढे चेन्नई एक्स्प्रेसने लोणावळा आणि मग रात्री अकरा वीसच्या लोकलने पुणे हा सगळा प्रवास अर्धजागृतावस्थेत केला. सगळे इतके दमले होते पण पुन्हा एकदा एक सर्वांगसुंदर आणि पुरेपुर पावसाळी ट्रेक केल्याचे समाधान मनात होते.

No comments:

Post a Comment